Monday, 26 September 2016

रामदास व मी

सावधान ऐकताच रामदास सावध झाले.
बोहल्यावरुन माघार.
तप केले,स्वामी झाले
समर्थ झाले.

मी मात्र अधीर होतो.
सावधान शब्द ऐकण्यासाठी
 तो शब्द कानावर पडताच
 कोण आनंद  झाला.
गळ्यात माळ पडावी
म्हणून कोण घाई!

क्षणिकच आनंद होता तो.
तेव्हां पासून मिळवलं काय?
गमावलं काय ?
याचा हिशोब केला.

आज ढळत्या वयात
ताळा केल्यावर कळलं
हाती काहीच आलं नाही.
प्रपंच लटका.
दुःखाचे डोंगरच वाट्याला आले.
अश्रूंची गणतीच नव्हती.
जखमा तर रोज रोज होत राहिल्या.
तरीही सावध झालो नाही,
जाग आली नाही.
 कळलं आकळलं नाही.
वेदनांच्या डोहात पुन्हा पुन्हा
लोटला गेलो

तरी पोहायची हौस फिटली नाही.
भवसागर तरायची आस
अजून तशीच आहे.
रडता रडता जगायचं
क्षणोक्षणी मरायचं.
असंच चालत राह्यलंय
म्हणून उदास मनाला
समजावत राह्यचं.

रामदास सूद्न्य होते
मी अडाणी,वेडा जीव
वेडावणारं जीवन जगायची हौस होती.
ती अपूर्णच.
वेड घेऊन पेडगावला नेहमीच
जावं लागलं.
नियती,प्रारब्ध,कर्मगती हीच
दुसरं  काय?

No comments:

Post a Comment