Thursday, 29 September 2016

तरल वाऱ्यानं---

तरल वाऱ्यानं कुठून तरी आणला
चुरगाळलेला कागद एक
रंग गुलाबी छोटा कपटा
गरगर फिरत पडला दाराशी
एकाकी
दुपारची वेळ
कडक ऊन.
उगीचच गेले डोळे फिरायला बाहेर.
तिथून निघाले दोन तीक्ष्ण शर
शिरले डोळ्यात
मिटले गपकन.
तरळल्या अनेक मुद्रा क्षणात त्या
असंख्यशी गरगर फिरलीत गुलाबी पत्रे
काही निळी,काही पिवळी
हलक्या रंगाची.
अक्षरं मोतीदार झळकली डोळ्या पुढे
कमलाक्ष मिचकावले बोलके कुणीतरी
काळ्याभोर पापण्यातून
ठिबकणाऱ्या शाईनं लिहलेलं
खारट पत्र शेवटचं
आठवलं.स्तंभित मी.

उचलला कपटा अन् पाहिलीत अक्षरं
कसलं काय
धुंद वास
कुठलासा उग्र दर्प
परदेशी अत्तराचा शिरला नाकात
तीन चार सोनेरी केस
बस् काहीच नाही.
कुणीतरी तारुण्याच्या उन्मादात
मदमत्त होऊन गाठली असेल मस्तानी
काळानं कठोरपणे
कालवली असेल माती जेवणात त्याच्या
आठवणीची गोड खूण
सप्रेम भेट
आज मात्र वाऱ्यावर स्वैर भैर
तिकडे तो धुंडाळत असेल कोपरा न् कोपरा
इकडे
अचानक माझ्या मनाचे उघडलेत कप्पे सारे.
आठवला
सोनेरी काळ पिसं लावून निघून गेलेला
दूरवर
असाच या कपट्या सारखा
गुलाबी शराबी डोळ्यांची आठवण ठेवून मागे.
मनहूस बेटा.

No comments:

Post a Comment